पुणे : राज्यशासनातर्फे राबविण्यात येणाऱ्या शेतकरी कर्जमाफी योजनेबाबतीतल्या तक्रारींचे निराकरण करण्यासाठी तालुकास्तरीय समित्या स्थापन करण्यात आल्या आहेत. शेतकऱ्यांनी आपल्या तक्रारी नोंदविण्यासाठी या समितीकडे संपर्क करावा, असे आवाहन सहकार आयुक्तालयाने केले आहे.
तालुक्यातील उप किंवा सहाय्यक निबंधक हे समितीचे अध्यक्ष असतील. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे तालुका प्रतिनिधी, अग्रणी बँकेचे प्रतिनिधी आणि लेखापरिक्षक समितीचे सदस्य, तर सहकार खात्यातील वरिष्ठ अधिकारी सचिव म्हणून काम पाहतील. प्रत्येक सोमवारी व गुरुवारी सहकारी संस्था कार्यालयात समितीची सभा होईल.
राज्यशासनाच्या शेतकरी कर्जमाफी योजनेनुसार कृषी कर्जास कर्जमाफी, परतफेड मुदतीत करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहनात्मक अनुदान, तसेच एकवेळ परतफेड योजना राबविण्यात येत आहे. बऱ्याच कर्जखात्यांवर अपुरी माहिती, चुकीची माहिती, चुकीचे लाॅगिंग इत्यादी कारणांमुळे प्रक्रिया करणे शक्य झालेले नाही. त्यामुळे या योजनेचा लाभ अद्याप मिळाला नसल्याबाबत अनेक शेतकऱ्यांच्या तक्रारी शासनाकडे, तसेच सहकार विभागाच्या विविध कार्यालयांकडे प्राप्त होत आहेत. या योजनेचा लाभ मिळालेल्या शेतकऱ्यांना बँका नव्याने कर्जपुरवठा करत नाहीत, अशाही तक्रारी येत आहेत. या तक्रारींचे निवारण करण्यासाठी शासनाने तालुकास्तरीय समित्या स्थापन केल्या आहेत.